पुणे : ‘कलम ३७० रद्द केल्यांनतर आता जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी प्रभावी धोरण असणे गरजेचे आहे. योग्य राजकीय माध्यमे वापरून काश्मिरी तरुणांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यातील महत्त्वाकांक्षा जाणून घेऊन संवादातील दरी कमी करणे आता महत्त्वाचे ठरेल,’ असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हूडा यांनी केले.
‘ईओ’ अर्थात ‘आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशन पुणे’तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात ‘कलम ३७०’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. या वेळी माजी लष्करी अधिकारी मेजर मारूफ रझा, ‘ईओ पुणे’चे प्रतिनिधी अक्षय आढळराव पाटील उपस्थित होते.
हूडा म्हणाले, ‘आता सरकारने काश्मीरबाबत सर्वंकष असा विचार करून ब्लू-प्रिंट तयार करायला हवी. काश्मिरी नागरिकांमध्ये भविष्याबद्दल काळजी आहे, तसेच २०१३ पासून काश्मीरमधील परिस्थिती सुरक्षिततेच्या दृष्टीने खालावत आहे. वाढता हिंसाचार, पाकिस्तानकडून होणारी ढवळाढवळ आणि शस्त्रसंधीचे होणारे उल्लंघन ही याची कारणे आहेत. तरुणांना कट्टरतावादाकडे नेले जात आहे; परंतु या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर काश्मिरी नागरिकांना शांततापूर्ण वातावरण आणि चांगले जीवन हवे आहे. राजकीय व लष्करी अशा एकत्रित प्रयत्नांमधूनच ते साध्य होऊ शकेल.’
‘काश्मीरमधील कट्टरवादाकडे झुकणाऱ्या तरुणांना परत वळविण्यासाठी भारतीय लष्कर विविध उपक्रम राबवत असून, स्थानिक तरुणांचा लष्करात समावेश करून घेऊन त्यांच्या क्षेत्रीय तुकड्या तयार करणे हा त्याचाच एक भाग आहे,’ असे हूडा यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘आपल्या ‘सद्भावना’ या उपक्रमाअंतर्गत लष्करातर्फे ५२ शाळाही चालवल्या जातात. तरुणांशी संवाद साधण्यासाठी केंद्रे चालवली जात आहेत, तसेच समुपदेशनही केले जात आहे. एका विशिष्ट समुदायाची ‘दगडफेक करणारे’ किंवा ‘देशद्रोही’ म्हणून होणारी हेटाळणी बंद करणे आणि नवीन राजकीय नेतृत्व या गोष्टींमधून शांततेकडे जाण्याचा मार्ग सापडू शकेल.’
रझा म्हणाले, ‘कलम ३७० रद्द करणे हे सरकारने उचललेले मोठे पाऊल आहे; परंतु आताच्या परिस्थितीत काश्मीरमध्ये निवडणुका घेणे ही चूक ठरेल. कारण ते पूर्वीच्याच मंडळींना पुन्हा निवडून देण्यासारखे आहे. देशातील उत्तम काम करणारे पोलिस अधिकारी, उत्तम प्रशासकीय अधिकारी, माजी लष्करी अधिकारी, शिक्षण व औद्योगिक क्षेत्रात चांगले काम करणारे लोक यांची काश्मीरसाठी धोरण तयार करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात मदत घेता येईल. आपल्याकडे कल्पना आणि संसाधने या दोन्हीचीही कमतरता नाही.’